Wednesday, February 8, 2017

GANAGAPUR

SHREE KSHETRA GANAGAPUR

श्रीक्षेत्र गाणगापूर:-
निर्गुण मठ (श्री दत्त मंदिर) :- श्रींची कर्मभूमी. श्रींच्या अनेक अतर्क्य लीलांनी पुनित झालेले हे तीर्थक्षेत्र. या मठात श्रींच्या निर्गुण पादुका आहेत.
श्रींनी आपले अवतार कार्य संपवून गाणगापूरहून निजानंद गमनासाठी आपल्या चार प्रिय शिष्यांसह (श्रीसिद्धमुनी, श्री सायंदेव, श्री नंदीनाम श्री नरहरीकवि) श्रीशैलकडे प्रस्थान केले.
शिशिर ऋतु माघमासीं | असितपक्ष प्रतिपदेसी |
शुक्रवारीं पुण्यदिवसीं | श्रीगुरु बैसले निजानंदी ||३७|| .५१
श्रीगुरु म्हणती शिष्यांसी | जातों आम्ही निज मठासी |
पावतां खूण तुम्हांसी | प्रसादपुष्पें पाठवितों ||३८|| .५१
श्री कल्लेश्वर मंदिर :- श्री क्षेत्र गाणगापुरच्या पूर्वेला अष्टतीर्थांपैकी मन्मथ तीर्थाच्या जवळ असलेले हे श्री कल्लेश्वर मंदिर. या मंदिर परिसरात श्री पंचमुखी गणेश, श्रीदुर्गापार्वती, नवग्रह आणि शमीवृक्षातून प्रकट झालेले शनैश्वर . देवतांची मंदिरे आहेत.
श्रीगुरुचरित्रातल्या ४९ व्या अध्यायात या श्री कल्लेश्वराचे महत्त्व सांगितलेले आहे.
ग्रामपूर्वभागेसी | कल्लेश्वर देव परियेसीं |
जैसे गोकर्णमहाबळेश्वरासी | समान क्षेत्र परियेसा ||९७||”
संगमेश्वर :- श्रीगरुचरित्रात ४९व्या अध्यायात या पवित्र स्थानांतील तीर्थांचे महात्म्य सांगितले आहे. या ठिकाणी अमरजा भीमा नदीचा संगम आहे. या संगमाच्या पश्चिमेला श्री संगमेश्वर (श्रीशंकराचे) मंदिर आहे. श्री येथे नित्य अनुष्ठानासाठी येत असत. “कल्पवृक्षातें पूजोनि | मग जावे शंकरभुवनीं | संगमेश्वर असे त्रिनयनी | पूजा करावी मनोभावें ||३९|| जैसा पर्वती मल्लिकार्जुन | तैसा संगमीं रुद्र आपण || भक्तिपूर्वक प्रदक्षिणा | करावी तुम्ही अवधारा ||४०||
अष्टतीर्थ स्थाने:-
भूमीवर असंख्य पवित्र तीर्थस्थाने असतानाही श्रींनी गाणगापूर क्षेत्रीच का वास्तव्य केले याबाबत श्रीगरुचरित्रात ४९व्या अध्यायात सविस्तर उल्लेख असून येथील अष्टतीर्थांचा महिमा सांगितलेला आहे. ती अष्टतीर्थें पुढीलप्रमाणे आहेत.
. षट्कुळ तीर्थ:-
भीमा अमरजा संगमाच्या पश्चिम तटावरील औदुंबरवृक्षासमोर असलेले हे षट्कुळ तीर्थ. हे प्रयाग तीर्थासमान आहे.
. श्री नरसिंह तीर्थ:-
भीमा अमरजा संगमाच्या पश्चिम तटावरील कल्पवृक्षासमोर असलेले हे श्री नरसिंह तीर्थ.
. भागीरथी तीर्थ:-
काशीप्रमाणेच येथे काही अंतरावर असलेल्या मणिकर्णिका कुंडातून निघालेले पाणी भीमा नदीला जाऊन मिळते ते ठिकाण म्हणजे भागीरथी तीर्थ. हे तीर्थ काशीसमान आहे.
. पापविनाशी तीर्थ:-
ऐसे प्रख्यात तीर्थ देखा | नाम पापविनाशी ऐका | जे करिती स्नान भक्तिपूर्वका | सप्तजन्मींचीं पापें जाती ||८४||
. कोटीतीर्थ:-
सोम-सूर्यग्रहाणासी | अथवा संक्रतिपर्वणीसी | अमापौर्णिमा प्रतिपदेसी | स्नान तेथें करावे ||८८|| सवत्सेसी धेनु देखा | सालंकृत करोनि ऐका | दान द्यावें व्दिजा निका | एकेक दान कोटिसरसे ||८९||
. रुद्रपादतीर्थ:-
हे तीर्थस्थान गया तीर्थासारखे आहे. रुद्रपादाची पूजा केल्याने कोटी जन्मांची पापे जातात.
. चक्रतीर्थ:-
येथे स्नान केल्याने पाप्याला ज्ञान होते व्दारका तीर्थासारखे पुण्य मिळते येथे अस्थि चक्रांकित होतात. या तीर्थाजवळ केशवदेवाचे मंदिर आहे.
. मन्मथ तीर्थ:-
ग्रामपूर्वभागेसी | कल्लेश्वर देव परियेसीं | जैसे गोकर्णमहाबळेश्वरासी | समान क्षेत्र परियेसा ||९७|| मन्मथ तीर्थीं स्नान करावे | क्ललेश्वरातें पूजावें | प्रजावृध्दी होय बरवें | अष्टैश्वर्यें पाविजे ||९८||”
विश्रांती कट्टा :-
श्रीगुरुचरित्राच्या ४८ व्या अध्यायात एका शुद्र शेतकऱ्याच्या भक्तीने संतोष पावून श्रींनी त्याच्यावर कृपा केल्याबाबतची सविस्तर घटना सांगितली आहे.
नागेशी :-
श्रीगुरुचरित्राच्या १३ १४ व्या अध्यायात श्रींच्या ज्या सायंदेव नावाच्या ब्राह्मणाच्या भेटीचा श्रींनी यवनापासून त्याला दिलेल्या अभयाबाबतचा उल्लेख आलेला आहे तो ब्राह्मण श्रींनी दिलेल्या आश्वासनानुसार २५ वर्षांनंतर गाणगापुरात श्रींच्या दर्शनार्थ आला ते श्रींची सेवा करण्याच्या निर्धाराने. त्या भक्ताचे अंत:करण पाहण्यासाठी श्रींनी श्री सायंदेवांची परीक्षा घेतली. त्याबाबतची घटना ४१ व्या अध्यायात सविस्तर आलेली आहे. ती घटना ज्या स्थानी घडली ते स्थान म्हणजे नागेशी.
सती कट्टा :-
माहूरच्या एका धनिकाच्या दत्त नावाच्या मुलाला त्याच्या विवाहानंतर चार वर्षांनी क्षय व्याधी झाली. ती बरी व्हावी म्हणून अनेक उपाय केले पण व्याधी विकोपाला गेली. सरतेशेवटी त्याची पत्नी त्याला घेऊन श्रींच्या दर्शनार्थ गाणगापूरला येताच त्याचे प्राणोत्क्रमण झाले. (यासंबंधाने श्रीगुरुचरित्रात ३०, ३१ ३२ सविस्तर वर्णन आलेले आहे.) धर्माचरणाप्रमाणे तिने सती जाण्याची ज्या स्थानी सर्व तयारी केली ती ही जागा.
कुमसी :-
श्रीगुरुचरित्राच्या २३ २४ व्या अध्यायात कुमसी ग्रामाच्या तीन वेद जाणणाऱ्या त्रिविक्रम भारती तपस्वीबाबतची घटना वर्णन केलेली आहे. श्रींनी कुमसी गांवी त्रिविक्रम भारतींना ज्या स्थानी विश्वरूप दर्शन दिले त्या स्थानाची छायाचित्रे सोबत दिलेली आहेत. हे स्थान गाणगापूरपासून ३७ कि.मी. अंतरावर भीमा नदी तटावर आहे.
हिप्परगी (मंदेवाल) :- श्गाणगापूरपासून ३९ कि.मी. अंतरावर विजापूर जिल्ह्यातील हे एक छोटेसे गांव आहे. श्रीगुरुचरित्रातील ४६ व्या अध्यायात नरहरी कविबाबत या स्थानी घडलेल्या घटनेचा उल्लेख आहे. पुढे नरहरी कवि श्रींचे भक्त झाले आणि गाणगापुरात श्रींवर स्तुतीपर अनेक कवने करून त्यांच्या अखंड सेवेत राहिले.
तंतुकेश्वर मंदिर :-
श्रीगुरुचरित्राच्या ४८ व्या अध्यायात तंतुकाबाबतची (विणकर) घटना आली आहे. श्रींनी एका भक्त तंतुकाला महाशिवरात्रीच्या दिवशी श्रीशैल्ययात्रा घडविल्याबाबतची ही घटना आहे. ज्या मंदिरात ही घटना घडली त्या मंदिराला पुढे तंतुकश्वराचे मंदिर असे नांव पडले.
गाणगापूरची गांव वेस :-
श्री नरसोबाच्या वाडीतील आपले १२ वर्षांचे वास्तव्य संपवून गाणगापूरला आले. प्रथमत: ते संगमावर राहिले. पण वांझ म्हशीला दुभती केल्याच्या चमत्कारामुळे ते प्रसिध्दीस आले. त्यामुळे गाणगापूरचा यवन राजा त्यांचा भक्त झाला. त्यानेच श्रींना आग्रह करून त्यांना वाजत गाजत ज्या वेशीतून गाणगापूर नगरांत आणले ती ही वेस. याबाबतचा उल्लेख श्रीगुरुचरित्राच्या २३ व्या अध्यायात आलेला आहे.
श्रींचे पुष्परूपाने पुनरागमन :-
या पंचक्रोशीत श्रीभक्तांमध्ये माघ कृष्ण चतुर्थीचा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.
माघ कृष्ण प्रतिपदा (गुरुप्रतिपदा), शुक्रवार या पुण्य दिवशी श्रींनी गाणगापूरहून निजानंद गमनासाठी आपल्या चार प्रिय शिष्यांसह श्रीशैलकडे प्रस्थान करण्यापूर्वी श्रींनी दु:खित भक्तांना, लौकिकार्थाने येथून जात असलो तरी आपला नित्य वास गाणगापूरीच असेल आणि भक्तांचा जसा भाव असेल त्याप्रमाणे मी त्याना माझे दर्शन घडेल, असे आश्वास दिले होते.
पाताळगंगेत पुष्पासनावर बसल्यावर श्रींनी आपल्या सोबत आलेल्या शिष्यांना आश्वासित केले की आपण निजानंदी पोहचल्याची खूण म्हणून चार शेवंतीची पुष्पें पाठवितो ती प्रसाद म्हणून स्वीकारावी त्यांची अखंड पूजा करावी. श्रींच्या आश्वासनाप्रमाणे शेवंतीची चार फुलं गंगेतून वाहात आली. तो दिवस म्हणजे माघ कृष्ण चतुर्थीचा होता.
आजच्या दिवशी श्रींच्या पुष्परूपी पुनरागमनाप्रित्यर्थ येथे दु.१२.३० वाजता श्रींचा पालखी सोहळा असतो. पंचक्रोशीतील हजारो श्रीभक्त या रोमांचकारी पालखी सोहळ्याला श्रींच्या दर्शनासाठी, त्यांच्या स्वागतासाठी, मोठ्या भक्तिभावाने उपस्थित असतात.
ही पालखी अष्टतीर्थांपैकी एक रुद्रपाद तीर्थापर्यंत वाजत-गाजत येते. या तीर्थांत श्रींच्या पादुकांना तीर्थस्नान असते. श्रीभक्तही या ठिकाणी आजच्या दिवशी या पवित्र तीर्थांत स्नान करून पुण्य मिळवतात. सोहळ्याला हजारो भक्तांची उपस्थिती असली तरी अतिशय शांतपणे हा सोहळा संपन्न होतो.
या भारलेल्या वातावरणाचे वर्णन शब्दांत करणे कठीण आहे.

   FOR FURTHER INFORMATION CLICK THE BELOW LINK
                                                        ↓


॥श्री गुरुदेव दत्त॥

 

No comments:

Post a Comment